Monday 30 March 2020

मानसिक स्वच्छतेची खूपच गरज असते.
    डॉ.हनुमंत भोपाळे
बहुतांश माणसं नियमितपणे तन,कपडे,घर स्वच्छ करतात.दातही.ही स्वच्छता केली नाही तर
दुर्गंधी पसरली जाते.शारीरिक आजार होतात अन् त्याचा उपद्रव इतरांना होतो.मानसिक स्वच्छता केली नाही तर
मानसिक आजार पसरतात.ह्यामुळेही स्वत:ला अन् इतरांना त्रास सहन करत जगावं लागते.
साबणने शरीर अन् सकारात्मक भावना, विचार आणि कल्पनेने मन,चित्त आणि बुद्धी स्वच्छ करता येईल.मग
आपलं आणि समाजाचे आरोग्य उत्तम राहील.
    यासाठी आपण आपल्या नकारात्मक विचार,भावना, कल्पना आणि दृष्टिकोनात बदल घडवून आणणे गरजेचे आहे.
हे काम आपली तयारी असेल,आपण केले तरच होते.
विश्वकल्याणाची भावना,प्रार्थना फार उपयुक्त ठरते.
चीनच्या कोरोनाची माहिती झालेल्या डॉक्टरच्या मनात ही कल्याणाची भावना होती.पण ही भावना काही जणांनी रूजू दिली नाही.त्यामुळे जग कोरोनाला बळ पडत आहे.एक दृष्ट विचार आणि कृतीने काय घडू शकते, यासाठी हे जागतिक पातळीवरील उदाहरण दिले आहे.
            सर्वांनी वैयक्तिक पातळीवर आपली मानसिक तपासणी करून घेतली पाहिजे.जे विकृत ते ते काढून टाकले तरच विधायकता रूजेल, वाढेल.
यासाठी आपले विचार, भावना,कल्पना आणि दृष्टिकोन तपासून घेऊन योग्य ते बदल घडवून आणण्यासाठी सिद्ध होणे सर्वांच्याच कल्याणासाठी उपकारक ठरणार आहे.
आपण आपल्या गरजेपेक्षा अधिक हाव करत असल्याने प्रकृतीवर,संस्कृतीवर घाव बसत आहेत अन् विकृतीला
बळ मिळत आहे.
आपल्या जीवनात सन्मान,यश , वैभव,मनासारखे नातेवाईक,
हवा त्या सहली, निवांत सहवास,प्रेमळ कुटुंब,आईवडिल, बहिण भाऊ आदी सगळे अन् तेही मनासारखं वागणारी माणसं भेटायलाच पाहिजे हा आग्रह असतो.आपण
कसंही वागलं तरी  चालते,इतरांनी आपल्या मनासारखं वागलं पाहिजे.अपेक्षांच्या
याद्या कधी तरी थांबवून
आहे त्यात आनंद मानत  वाटचाल आहोत की नाही?
भय तरी किती बाळगायचे.
सतत घेण्याचा विचार,
देण्याच नाव नाही.न देताच काही परत कसं मिळेल?
सतत स्वार्थानं आंधळ होऊन
निखळ आनंद नाही मिळत.
त्यागातही आनंद असतो,हे आपण
हे विसरूनच गेलोत.
सगळे माझ्यासाठी
अन् सगळं माझ्यासाठीच आधुनिक धोरण
माणुसकीला मारक ठरत आहे.
 दुराग्रह दुःखी करत आहे.
सगळ्यांनी आपल्याच मनासारखं वागावं बोलाव असं वाटतं
पण
ते खरंच शक्य आहे का?आपण तरी तसं करतो का?
एक काल्पनिक किस्सा आहे.
एकदा एकजण देवाला
म्हणाला
  "देवा मला न भांडणारी, शांत, प्रेमळ बायको मिळू दे!"
देव म्हणाला," तशी भेटत असली असती तर मी केली नसती का?
जे उपलब्ध नाही ते मागायचं नसते वत्सा"
यातला विनोद बाजूला केला,बायकोनंच चांगलं वागावं,आपण कसही वागलं तर सुख, शांती कशी नांदेल!
 खरं तर दुस-यांकडून अपेक्षा करण्याअगोदर आपण स्वत:ला
विचारले पाहिजे.
आपलं मन तरी आपलं ऐकतं का?
आपण तरी सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करतो का?
सगळ्या अपेक्षा पुर्ण करणं शक्य आणि आवश्यक तरी असते का?
आपलं मन घंट्याघंट्याला बदलते, राजकारणी माणसं टोपी बदलावे तसे.
सरड्यान रंग बदलावे तसे म्हटले तरी चालेल.
मग लोक बदलले तर एवढं दुःख वाटून घेण्याचं कारण काय?
परिवर्तन हा जगाचा नियम आहे.
जे जे बदलणं शक्य ते ते बदलून अन् जे जे बदलणं शक्य नसेल त्याचा स्वीकार करून
बदलासोबत समन्वय साधून जगता आलं तर काही तरी निश्चितच सुखकर वाट्याला येईल.मनासारखं घडलं
नाही तेव्हा  जे घडले ते मनासारखं आहे अशी मनाची समजूत घालून  जगणारी माणसं आनंदाने जगू शकतात.
     लोकांचा जन्म आपल्या मनासारखं वागायलाच
थोडाच झालाय.
त्यांचे वेगवेगळे ध्येय,आवडीनिवडी, आशाअपेक्षा आहेत.आग्रह, दुराग्रह,समज ,गैरसमज, अहंकार,स्वार्थ
द्वेष,मत्सर,राग आहेत.यापासून कोण अलिप्त आहे?
स्वत:भोवती फिरत राहिल्याने जग फिरून येता येतं नाही.
जितकं आपण अलिप्त, निरपेक्ष,क्षमाशील, सहनशील,
प्रेमळ आणि कार्यमग्न राहू तितकं मानसिक दुःख कमी जवळ येईल, एवढं आपल्या हाती आहे.
यासाठी रोज सकारात्मक बळ वाढवत
 वाटचाल करावी लागेल.
दुर्बलतेला काही फारसं सहन होत नाही.सहनशीलता, विधायक ध्येय  सोडून देणारे सामर्थ्य मिळवू शकत नाहीत.
साधनेने सहनशीलता अन् सामर्थ्य वाढतं जाते.
             इच्छा, अपेक्षा हे दुःखाचं मूळ असल्याचे
तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितले आहेच.
इच्छा अपेक्षेचे घोडे इतक्या भयानक गतीने उधळत आहेत की,आनंदाचा चक्काचूर होऊन जात आहे.
आपण स्वत:ला विचारू या.
आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षण करुन पाहू या.

आपलं ते बाब्या अन् लोकांचं ते कारटं ह्या संकुचित मनोवृत्तीने आपल्याला घेरले तरी नाही ना?
 संतुलितपणे , विवेकबुद्धी शाबूत ठेवून  वागता, बोलता,पाहता आले तर बरेच दुःखाचे ढग दूर करू होतील.दूर राहतील.
खरंच सगळ्यांचीच आपल्याला गरजेचं असते का?
सगळेच धावतपळत यावेत.आदरसत्कार , सहकार्य करावे,हा अट्टाहास
का बरं?
सगळेच आपल्याभोवती गोळा झाले तर आपण इतक्या लोकांना वेळ तरी देऊ शकतो का?
 विचारात बदल केला तर कधी कधी परिस्थिती बदलणार नाही पण मनःस्थिती बदलते.मग दुःख वाटत नाही.
एकजण छान लग्न पार पडल्यानंतर
हनिमूनचा आनंद घ्यायचा सोडून
नको ते विचार करीत बसला.
' कोण कोण
लग्नाला आले नव्हते?'
'का आले नसतील?मुद्दाम आले नसतील.'
'मी तर त्यांना पत्रिका दिली.फोन केला.
'मला येतो म्हणाले होते.खोटं बोलले.
आले नाहीत.'
बदमाश आहेत,असा नकारात्मक विचार करून
दुःखी होऊ लागला.
एवढ्यावरच तो थांबला नाही.
तो बायकोला म्हणाला"
तू पत्रिका दिलेले, बोलवलेले किती जण आले होते?
कोण कोण आले नव्हते ?
आठव जरा.
का आले नव्हते?
याचा शोध घे बरं"
ती म्हणाली,"झाले गेले गंगेला मिळाले.
भूतकाळ परत येत नसतो.
मी भूतकाळ पाहत नसते.
अहो," जे हआले होते त्यांना तरी नीट वेळ देऊ शकलो का?
सगळ्यांची गरज होती का?
आपण दोघे आलो असतो तरी जमलं असतं की.
कोण आले हे महत्त्वाचे नाही
आता आपण एकमेकांच्या अधिक जवळ येणं आणि
जवळ राहणं, समजून सांगण, समजून घेणे,सहन करणं,सेवा करणं,प्रेम देणं, एकमेकांना मुठीत ठेवण्याची धडपड न करता एकमेकांच्या मिठीत राहणं
हे गरजेचे आहे.तसं करू या
कामचं लक्षात ठेवून जगू लागलो की बिनकामचं बाजूला ठेवणं जमतं."
राजकारणी माणसासारखं
सर्वांचे आभार मानून मोकळे होऊ या."
एवढं सगळं ऐकून तो थोडा भानावर आला.
 खरं तर भूतकाळात जाऊन स्वत:ला दुःखी करत बसण्यापेक्षा वर्तमानात जगायला हवे तरच आनंदी राहू शकतो.
आनंदी राहिलो तरच आनंद देऊ शकतो.
विहीर असेल तरच पोह-यात कुठून येईल ?
लाईकवर लक्ष न देता लायकी वाढवत वाटचाल करणं अधिक हितकर ठरेल.
जे कंटाळलेत, जे टाळत आहेत त्यांना कवटाळण्यात अर्थ नसतो.
बरं जी माणसं आपल्याला लाईक करतात, त्यांना आपण लाईक करतो का?
जे आपल्याला लाईक करत नाहीत त्यांनी लाईक करावं म्हणून तरी दुःखी कशाला व्हायाचं?
सगळेच आपल्या मार्गाने कसे येतील.
ज्यांना ज्या गावाला जायचे त्या गावाला जातील.
आपल्याला जिथे जायाचं तिथे आपण जायाला पाहिजे.
या रस्त्यावर सोबतीला भेटतातच.
नाही कुणी भेटलं तर आपण आपल्यासोबत राहिलो तरी
प्रवास आनंददायी होतो.
आपण आपल्या सोबत नसू तर
आनंद सोबत येऊ शकत, राहू शकत नाही..
गर्दी जमविण्याच्या नादात दर्दीला वेळ देता येत नाही असे तर होतं नाही ना?
कृत्रिम फुलांच्या प्रेमात पडल्यामुळे ख-या फुलांच्या सुगंधानपासून मुकत तरी नाही ना ? जसं कृत्रिम फुलांकडून सुगंध मिळत नाही तसं स्वार्थी,ढोंगी नकारात्मक विचार, भावना आणि कल्पनेत जगणा-या माणसांकडून प्रेमाची अपेक्षा म्हणजे अग्निकडून थंडाव्याची अपेक्षा करणं होय.
पळत्या पांखरा मागे पळू नये
ज्यांना आपलं अंत:करण कळत नाही त्यांच्यासाठी
स्वत:ला जाळू नये.
बरं  आपण बाह्य जगाच्या मागे लागून
आपल्या अंर्तमनासोबत,स्वत: सोबत
राहायचं विसरून गेलो तर नाही ना?
खरं तर आनंदाचं केंद्र मन, अंर्तमन असते.
मनच ठरवतं असते, कशात आनंद मानायचा अन् कशात नाही.
मन प्रसन्न तर सगळ्या गोष्टींचा आनंद घेऊ शकतो.नाहीतर मग कशातच आनंद नाही वाटत.
स्वत:सोबत रममाण होऊ शकतात ती माणसं आनंदी असतात, बाहेर आनंद शोधत फिरणारी माणसं आनंदी नसतात,ती तशी भासवतात.आपलाही तसा भास होतो.
मृगजळामागे लागून खरा आनंद गमावत चाललो आहोत.
भासवण्याचा नाद लागला की,
असणं विसरून जातो आपण.
बरं आपल्या जे जे मिळाले त्यांचं स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करायला कधी वेळ काढलाय का?
कृतज्ञता नसलेली  माणसं आनंद गमावून बसतात.
जे जे मिळाले  त्याविषयी कृतज्ञ राहून आनंद मानला तर आनंद वाटतो.
आनंदी राहून जे काही मिळवायचे ते मिळवत वाटचाल करू लागलो तर आपला प्रवास आनंददायी होईल.
आधी तोंडात घेतलेल्या घासाचा आस्वाद
अन् घ्यायला हवा.ते विसरून आपण  घाईघाईने घास गिळून टाकत आहोत.
भूक  लागलेली नसता  पुन्हा मिळेल की नाही म्हणून पोटात कोंबण चालू आहे, त्यामुळे तृप्तीचा ढेकर येतंच नाही.
अपचणाचा त्रास मात्र होत आहे.
मिळाले त्यात समाधान, कृतज्ञता व्यक्त करीत अजून आवश्यक ते मिळवण्यासाठी नियोजन करून ते मिळवण्यासाठी धडपडायला काही हरकत नाही.
त्याआधी'
'सबका कल्याण होय रे'ही
मंगलमैत्री,
'सर्वे भवन्तु सुखिन:
'सर्वे  संन्तु निरामया:'

'पसायदान, '
वामनराव पै यांनी सांगितलेली' विश्वप्रार्थना'
मानसिक प्रसन्नता देऊ शकते.
माझी माय  रूख्मीणबाई
संध्याकाळी झोपताना सर्व देवांचे स्मरण करून
'देवा सर्वांचं भल कर,मग माझ्या लेकरांचं भलं कर' असं म्हणायची.
आपणही सर्वांच्या कल्याणाची भावना, सकारात्मक विचार आणि प्रार्थना केली तरी दुष्ट भावना त्रास देत नाहीत.शांत झोप लागते.
विपश्यना, योगसाधना,सत्संग,घडले तशी सेवा,सत्संग, विधायक धंद आणि आपल्या विधायक ध्येयावर
लक्ष ठेवून वाटचाल केली तरच कल्याण होईल.
जगात सुख, शांतता आणि आरोग्य नांदेल.

डॉ. हनुमंत भोपाळे
    मोबाईल नंबर:9767704604

 Email:    hanumantbhopale@Gmail.com
ब्लागला भेट देण्यासाठी
https://           drhanumantbhopalesir.blogspot.com
फेसबुकवर
Facebook:      hanumantbhopale

No comments:

Post a Comment